स्त्री सौंदर्य आणि सनातन धर्म.
■ रश्मिका मंदाना हिचा एक अतिशय सुंदर व सोज्वळ फोटो मी मित्रांच्या ग्रुप वर पोस्ट केला होता. त्यावर एका मित्राने असे म्हटले की, " प्रसाद भटा तू वेदांचे महत्व सांगतोस आणि असे फोटो कसे बरे टाकतोस? "
☆ त्यामुळे मला रागवण्याचे काहीच कारण नाही. उलट असे इतरांच्या मनात आले असू शकते. म्हणूनच एक विचारसरणी अधिक स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि काही मुद्दे मांडतोय. 🫳
■ वेद हे प्रत्येक सनातनी व्यक्तीला 4 आश्रमांप्रमाणे कर्म करण्यास सांगतात. चार आश्रम असे आहेत - ब्रह्मचर्य गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ जीवनात उत्तम धनप्राप्त्ती , शृंगार, प्रजोत्पादन आदि कर्तव्ये दिलेली आहेत.
☆ वेद हे 4 पुरुषार्थ परिपूर्ण करण्यास सांगतात. ते असे - धर्म, अर्थ, काम व मोक्ष . ..धर्म व मोक्ष यांच्या 2 तीरां मध्ये अर्थ व काम योग्य रीत्या वाहिले की मग त्यास प्रत्यवाय नाही असेही सांगितले आहे.
[ आयुर्वेद हा आहे; त्या 4 हि पुरुषार्थाचे मूळ म्हणजे आरोग्य सांभाळणारा उपवेद. ]
● आपल्याकडे मंदिरामध्ये अत्यंत सुंदर स्त्रियांची उत्तम शिल्पे आहेत. खजुराहो येथील मंदिरातील ' काम शिल्पे ' प्रसिद्धच आहेत.
मंदिरांच्या भिंतींवर कोरलेल्या स्वर्गीय सौंदर्यवतींना 'सुरसुंदरी' किंवा 'अप्सरा' म्हटले जाते. विशेषतः कर्नाटकातील बेलूर आणि हळेबीडू येथील होयसाळ मंदिरांमधील ' मदनिका शिल्पे ' जगप्रसिद्ध आहेत.
या शिल्पांमध्ये स्त्रीच्या शरीराचा लवचिकपणा आणि विविध मुद्रा (Poses) अतिशय सूक्ष्मतेने कोरल्या आहेत.
चेन्नकेशवा मंदिर बेलूर, कर्नाटक येथील दर्पणसुंदरीचे खालील चित्रात दाखवलेले शिल्प खूप प्रसिद्ध आहे.
● स्वर्गातील अप्सरांचे मनमोहक वर्णन पुराणांमध्ये अनेक ठिकाणी आले आहे. याव्यतिरिक्त काहीवेळा योगी, विरागी देखील अप्सरांच्या सौंदर्याला भुलल्याची कथानके आली आहेत.
■ पुढे पुढे स्त्री म्हणजे नरकाचे द्वार आणि ब्रह्मचर्याचा अतिरेक या गोष्टी वाढीस लागल्याने काम, वासना हे शब्द काढणे कठीण झाले. आजच्या कामुक जगात अजूनही ते शब्द काढणे सभ्यतेचे मानले जात नाही; हे दुर्दैवच होय.
■ एवढे सगळे असले तरीपण याला ताजा कलम आहे म्हणजे कंडिशन्स अप्लाय आहे. त्या अशा - ' कुठलाही धर्म असो तो केवळ मार्गदर्शक आहे. ' कालसुसंगतपणे आपण आपले स्वतःचे तत्वज्ञान त्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. अन्यथा धर्मांतील चुकीच्या गोष्टी तशाच पुढे चालत राहील्याने मानवी समाजाचे नुकसान झाल्याचे दाखले काही कमी नाहीत.
●ॐ अधिक चांगला माणूस बनणे हेच सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे.
~
आपला; डॉक्टर प्रसाद फाटक पुणे.
Comments